पंढरपूर : आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार? | पुढारी

पंढरपूर : आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार?

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोताश्रीवर मुक्काम हलवला आहे, तर शिवसेनेचे नाराज आमदार भाजपबरोबर सत्तास्थापन करा म्हणत आहेत. हिंदुत्व व मराठा बाणा जपत ठाकरे भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत. मात्र, तरीही महाविकास आघाडी सरकार टिकेल की नाही, याबाबत व्दिधा मनस्थिती आहे. त्यामुळे यंदा आषाढी वारीची शासकीय महापूजा करण्याचा मान कोणाला मिळणार, याबाबत पंढरीमध्ये चर्चा रंगताना दिसून येत आहे.

दरवर्षी आषाढी सोहळ्यातील शासकीय महापूजेचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर सर्वच वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी सोहळ्यातील महापूजा मोठ्या भक्‍तिभावात पार पडल्या आहेत. अनेकवेळा राज्यातील विविध प्रश्‍न घेऊन मुख्यमंत्र्यांना या महापूजेपासून रोखण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून होत असल्याने आषाढी सोहळा कालावधीमध्ये या महापूजेबाबत नेहमीच राजकीय फड रंगल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे प्रत्येक आषाढी सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा महत्त्वपूर्ण घटना ठरत असते.

कोरोनानंतर दोन वर्षांनी आषाढी सोहळा भरत असल्याने मोठ्या भक्‍तिभावाने व भाविकांच्या वाढत्या संख्येने हा सोहळा साजरा होत असून यंदाच्या या सोहळ्यातील महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिर संवर्धनास भरघोष निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला होता. सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत.

महाविकास अघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या घटक पक्षांच्या गोटातील राजकीय खलबतांना चांगलाचा राजकीय रंग चढू लागला आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील महाविकास अघाडीच्या सत्तेला धोका निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. परंतु, भाजपच्या अनेक नेत्यांकडून तसा दावाही केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जर सत्ताबदल झाला तर मुख्यमंत्री या नात्याने यंदाच्या आषाढी वारीची शासकीय महापूजा करण्याचा मान कोणाला मिळणार की हा सत्तासंघर्ष थंडावला जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच निमंत्रणाप्रमाणे महापूजा करण्याची संधी मिळणार, याकडे राज्यातील भाविकांसह पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.

दि. 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे मुख्यमंत्री करत असतात. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून अलिकडेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महापूजेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून येणारा आदेश अंतिम असणार आहे.
– गहिनीनाथ महाराज औसेकर,
सहअध्यक्ष

Back to top button