संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी राहण्याची शक्यता आहे. एकीकडे जास्तीत जास्त विधेयके मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील तर दुसरीकडे विविध मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची रणनीती राहील. विरोधी पक्षांकडून जे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले जाऊ शकतात, त्यात मणिपूरमधील हिंसाचार, रेल्वे सुरक्षा, वाढती महागाई व अदानी प्रकरणाचा समावेश आहे. दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्याचे अधिकार उपराज्यपालांकडे राहतील, असे सांगत केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. या मुद्द्यावर राज्यसभेत राडेबाजी होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष या विषयावर आक्रमक असून त्यांना अलीकडेच काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे.