हिंदुस्थानला गांधी बाधा झालेली आहे; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य | पुढारी

हिंदुस्थानला गांधी बाधा झालेली आहे; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत येणारे सभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे चर्चेला उधाण आलेलं आहे. भिडे म्हणाले की, “हिंदुस्तानाला गांधी बाधा झालेली आहे. त्यामुळे देशातील सर्व १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल”, असे वक्तव्य केलेले आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी संभाजी भिडे बोलत होते. ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात काही कार्यक्रमात खाण्या-पिण्यात अनेकांना विषबाधा होते. या बाधांवर उपाय आहेत. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तीन बाधांवर तोडगा कोणता असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांना प्रिय असणारं कार्य पूर्ण कसं होईल? यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न करायला हवा.”

“शिवछत्रपतींना काय प्रिय होतं? मरणाच्या वेळी देखील हा महापुरुष आपलं कुटुंब, लेकीबाळी, सुना-नातवंड यांचा विचार करत नव्हता. ३ एप्रिल १६८० रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी शिवछत्रपतींच्या देहातून प्राण निघून गेले. त्याआधी अर्धा मिनीट सगळं बळ एकवटून अंथरुणावरचं आपलं शरीर उचलून भोवतीच्या माणसांना शिवछत्रपती म्हणाले ‘आम्ही जातो, आमचा इथला मुक्काम संपला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. सप्तसिंधू म्हणजे काय? हिमालयात उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, सिंधू सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी अशा सात नद्या”, असे मत भिडेंनी व्यक्त केले.

भिडे पुढे म्हणाले की, “सबंध जगाचा त्राता म्हणून ताकद हिंदुस्थानला मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. सबंध हिंदुस्थानचा रक्तगट बदलायला हवा. १२३ कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे.”

पहा व्हिडिओ : व्हीलचेअरच्या साथीने विवेक बघतोय अजिंक्य होण्याची स्वप्नं

Back to top button