खार्टुम वृत्तसंस्था : स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी युद्धग्रस्त सुदानमध्ये, महिलांना सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे. असे करण्यास नकार दिलेल्या एका महिलेचे पाय सैनिकांनी जाळून टाकल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ‘द गार्डियन’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सैनिकांच्या अत्याचाराला कंटाळून ओमदुरमन शहरातून पळून गेलेल्या दोन डझनहून अधिक महिलांनी सांगितले की, कुटुंबाचे पोट भरायचे तर सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवणे हाच आमच्यासमोरील एकमेव मार्ग आहे. तसे केले तरच आम्हाला अन्न आणि जीवनावश्यक वस्तू मिळू शकतात. काही प्रमाणात पैसेही मिळतात. देशात सध्या अराजकसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये कारखान्यांच्या गोदामात अन्नाचा साठा केला जात आहे. माझे आई-वडील खूप वृद्ध आणि आजारी आहेत आणि मी माझ्या मुलीला अन्न शोधण्यासाठी कधीही बाहेर जाऊ दिले नाही. अखेर मी सैनिकांकडे गेले. कारण, अन्न मिळवण्याचा तोच एकमेव मार्ग माझ्याकडे उरला होता.
सैनिकांकडून महिलांना पडक्या घरांमध्ये आणून रांगेत उभे करण्यात येते. कधी कधी या महिलांच्या आर्त किंकाळ्यांचा आवाज आमच्या कानी पडतो. मात्र, आम्ही काहीही करू शकत नाही, अशी माहिती एका स्थानिकाने दिली. अन्य एका असहाय एकवीस वर्षीय तरुणीने सांगितले की, एकदा मी सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी माझा अनन्वित छळ केला. एवढेच नव्हे तर त्यांनी माझे पाय जाळून टाकले.