

नवी दिल्ली : दिल्ली शहर आता ब्रिक्स परिषदेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. राजधानीत कडक सुरक्षा आहे. सुरक्षेचा भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांपासून ते सरकारी आणि खाजगी कार्यालयांपर्यंत सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारत मंडपम येथे १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या १८ वी ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. परदेशी पाहुण्यांचे आगमनही सुरू झाले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ११ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ सप्टेंबर रोजी दिल्लीत पोहोचतील. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन हे देखील शुक्रवारी दिल्लीत येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर भारत मंडपममधील तयारीची झलक दाखवणारा २६ सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राजधानीतील सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधून सुमारे १५,००० पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या जवळपास २०० कंपन्या तैनात केल्या आहेत. परिषदेचे कव्हरेज करण्यासाठी जगभरातून मीडियाचे प्रतिनिधीही दाखल झाले आहेते.
भारताच्या अध्यक्षतेखाली असणार 'चार सूत्री' एजेंडा
भारताने १ जानेवारी २०२६ रोजी चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. यंदा भारताने समूहाच्या अध्यक्षतेसाठी ‘लवचिकता, नवविचार, सहकार्य आणि शाश्वता’ हा मुख्य विषय ठेवला आहे. या चार प्रमुख स्तंभांच्या आधारे आरोग्य, कृषी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आपत्ती जोखीम कमी करणे, व्यापार, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी, उच्च तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जात आहे.
१२ सप्टेंबर : बहुपक्षवाद आणि बंद दाराआड चर्चा
परिषदेचा पहिला दिन काहीसा निमसरकारी किंवा मर्यादित स्वरूपाचा असेल. दुपारी २:३५ वाजता ब्रिक्स सदस्य देशांचे नेते ‘समावेशी जागतिक शासन आणि बहुपक्षवाद बळकट करणे’ या विषयावर बंद दाराआड महत्त्वाची बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी ४:२५ वाजता नेते ‘भारत इनोव्हेट्स प्रदर्शना’ ला भेट देतील. पहिल्या दिवसाचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या रात्रीच्या भोजनाने होईल.
१३ सप्टेंबर : ‘ग्लोबल साऊथ’च्या सर्वसमावेशक विकासावर भर
दुसऱ्या दिवशी, ब्रिक्स सदस्य देशांव्यतिरिक्त भागीदार आणि आमंत्रित देशांचे नेतेही सहभागी होणार आहेत. सकाळी १०.५० वाजता मुख्य खुले सत्र सुरू होईल. ‘लवचिकता, नवविचार, सहकार्य आणि शाश्वता : समावेशी जागतिक विकासासाठी भविष्याला आकार देणे’ या मुख्य विषयावर चर्चा होईल. यादरम्यान जागतिक आर्थिक आव्हाने, अन्न व ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर मंथन केले जाईल. या ऐतिहासिक परिषदेच्या शेवटी 'नवी दिल्ली घोषणापत्र' जारी केले जाईल.