पुढारी ऑनलाईन डेस्क : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे त्याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा हा २००८ मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहसंगठकांपैकी एक असल्याचा आरोप आहे. अमेरिकेत त्याच्यावर खटला चालवून शिक्षा झाल्यानंतर भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मात्र, त्याने विविध कायदेशीर उपाय योजत प्रत्यार्पणाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी अमेरिकेतील न्यायालयांनी यापूर्वीच भारताच्या बाजूने निर्णय दिला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्याच्या याचिकेला फेटाळा देत प्रत्यार्पणाच्या निर्णयाला मान्यता दिली. आता लवकरच तहव्वुर राणाला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे, जिथे त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाईल.
राणाने याचिकेत म्हटलं आहे की, भारतात माझा छळ होण्याची शक्यता जास्त आहे कारण तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे. तो अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्याला हृदयविकाराचा झटका, पार्किन्सन आणि संभाव्य मूत्राशयाचा कर्करोग यांचा समावेश आहे. राणाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की तो खटल्याला सामोरे जाण्यासाठी जास्त काळ जगू शकणार नाही.
२१ जानेवारी रोजीअमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने राणाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, त्यांच्या प्रशासनाने राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती.