

काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिलासा देत नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या कुटुंबांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय लागू केला आहे.
प्रत्येक मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला त्यांच्या जिल्ह्यातच नोकरी देण्यात येणार आहे. नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीने यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून संबंधित कुटुंबांची यादीही जाहीर केली आहे. नोकरी देताना उमेदवाराची पात्रता आणि कौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. कुटुंबांना 35 दिवसांच्या आत आपले नाते सिद्ध करून नियुक्तीपत्र स्वीकारावे लागणार आहे. 8 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर आणखी 8 जणांनी दुसर्या दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले. या आंदोनात एकूण 77 जणांचा मृत्यू झाला होता.