![Gupta brothers Arrested in uttrakhand](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FUntitled-design-T-.-1-277.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी, ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील बिल्डर सतींदर सिंग उर्फ बाबा साहनी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अनिल गुप्ता आणि अजय गुप्ता यांची नावे लिहली होती. गुप्ता यांनी साहनी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना उत्तराखंड पोलिसांनी सोमवारी (दि.27) अटक केली आहे. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेने भारत सरकारशी चर्चा करण्याची योजना आखली आहे.उत्तराखंडमध्ये गुप्ता बंधूंच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या एजन्सी सक्रिय झाल्या आहेत.
गुप्ता बंधू हे तीन भावांचे त्रिकूट आहे. यामध्ये अतुल, अजय आणि राजेश गुप्ता यांचा समावेश आहे. या त्रिकुटावर दक्षिण आफ्रिकेतील सरकारी उद्योगांकडून कोट्यवधींची लूट केल्याचा आरोप आहे. हे तिघे भाऊ माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्यासोबत जवळीक होती. झुमा यांच्या कनेक्शनद्वारे कोट्यवधी पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोपसुद्धा त्यांच्यावर आहे. जेकब झुमा हे 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर, गुप्ता बंधू आपल्या कुटुंबासह एका रात्रीत दक्षिण आफ्रिकेतून दुबईला पळून गेले.
2023 मध्ये, संयुक्त अरब अमीरातने राजेश आणि अतुल यांच्या प्रत्यार्पणाची विनंती नाकारली होती, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने त्यांना फरारी घोषित केले. गुप्ता बंधूंच्या दक्षिण आफ्रिकेतील मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यांची मालमत्ता सोडवण्यासाठी ते कायदेशीर लढा देत आहेत. त्याचबरोबर या तिन्ही भावांना आपल्या देशात आणण्यासाठी दक्षिण आफ्रिका सातत्याने प्रयत्न करत आहे. या तिन्ही भावांना दक्षिण आफ्रिकेत परत आणणे ही दक्षिण आफ्रिका सरकारच्या श्रेयाची बाब ठरणार आहे.
नुकतेच गुप्ता बंधूंपैकी दोघांना उत्तराखंडमध्ये अटक करण्यात आली आहे. वास्तविक, उत्तराखंडमधील आघाडीचे बिल्डर सतींदर सिंग उर्फ बाबा साहनी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अनिल गुप्ता आणि अजय गुप्ता यांची नावे लिहली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. डेहराडून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही बातमी समजताच दक्षिण आफ्रिकेच्या तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. दक्षिण आफ्रिकेत अचानक या बंधूंबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दक्षिण आफ्रिकेतून पळून गेलेला हाच अजय गुप्ता आहे का, हा या प्रकरणात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या न्याय विभागाचे प्रवक्ते क्रिस्पिन फिरी म्हणाले की, त्यांचे अटक वॉरंट राजेश आणि अतुल गुप्ता यांच्यासाठी होते, परंतु सत्यापन आणि संभाव्य लिंकिंगसाठी औपचारिक प्रक्रिया सुरू आहेत. आतापर्यंत, भारत सरकारने किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने उत्तराखंडमध्ये अटक केलेले दोन गुप्ता बंधू खरोखरच तेच आहेत, ज्यांना दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने वाँटेड घोषित केले आहे याची पुष्टी केलेली नाही.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी जोहान्सबर्ग येथे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या रॅलीत बोलताना न्यायमंत्री रोनाल्ड लमोला यांनी पुष्टी केली की, दक्षिण आफ्रिका सरकारला गुप्ता कुटुंबातील सदस्यांना भारतात अटक झाल्याची माहिती होती, परंतु त्यांचा सहभाग असेल की नाही हे अद्याप अनिश्चित आहे. त्यामध्ये एक आरोपी आहे ज्यांच्याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने अटक वॉरंट जारी केले होते. अशा परिस्थितीत, जोपर्यंत भारत सरकारमध्ये सर्वकाही स्पष्ट करत नाही, तोपर्यंत गुप्ता बंधूंचे दक्षिण आफ्रिकेला प्रत्यार्पण करण्याबाबत काहीही स्पष्ट करता येणार नाही.