गुगल भारतात AI मध्ये मोठी गुंतवणूक करणार : 'सीईओ' पिचाई
पुढारी ऑनलाईन डेस्क : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे डिजिटल इंडियाचे व्हिजन आहे. ते कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांबद्दलही विचार करत आहेत. आम्ही भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत." अशी माहिती गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज (दि.२३) माध्यमांशी बोलताना दिली. अमेरिका दौर्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक कंपन्यांच्या प्रमुख सीईओंबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
यावेळी सुंदर पिचाई म्हणाले की, "आम्हाला भारतात बनवलेले पिक्सेल फोनचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील कृषी आणि पायाभूत सुविधांबद्दलही सखोल विचार करत आहेत. डेटा सेंटरबरोबर ऊर्जा केंद्रांबाबतही ते गांभीर्याने विचार करत आहेत."
आम्ही भारतामध्ये AI मध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत
आम्ही भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. भारतात आम्ही आमची भागीदारी निश्चित केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) भारतातील जनतेच्या फायद्यासाठी आहे. याचा वापर भारतातील लोकांच्या सेवेसाठी असला पाहिजे अशी पंतप्रधान मोदी यांची दृष्टी आहे. त्यांचा हा दृष्टीकोन आम्हाला AI क्षेत्रात अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचेही सुंदर पिचाई यांनी सांगितले.
मोदींच्या दूरदृष्टीबद्दल जाणून घेण्याचा सन्मान मिळाला : 'एक्सेंचर' सीईओ
या बैठकीनंतर एक्सेंचर कंपनीच्या सीईओ ज्युली स्वीट म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांच्यांशी भेटून पुढच्या दशकातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल अधिक जाणून घेण्याचा मला सन्मान मिळाला. भारताला जागतिक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग बनवताना ऍक्सेंचर सारख्या इतर अनेक कंपन्यांच्या वचनबद्धतेबद्दल मला खूप आनंद झाला.