

ब्रुसेल्स; वृत्तसंस्था : युरोपमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत तेराशेवर बळी गेले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण आला असून संपूर्ण खंडात मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यातही या उष्णतेच्या लाटेचा फ्रान्सला सर्वांत मोठा फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, हे संकट भारतासाठी एक गंभीर इशारा आहे, जिथे कडक उन्हाळा आता सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठे संकट बनत चालला आहे.
आशियायी देशानांही इशारा
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात दरवर्षी सुमारे ४.९ लाख लोकांचा मृत्यू उष्णतेशी संबंधित कारणांमुळे होतो. यापैकी जवळपास ४५ टक्के मृत्यू आशियात होतात. आता हे संकट आशियातही येऊ घातले आहे. कारण या खंडातील देशांचे तापमान सातत्याने वाढत आहे. एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी रविवारी सांगितले की, २१ जूनपासून युरोपमध्ये उच्च तापमानाशी संबंधित १,३०० हून अधिक अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. "उष्णतेच्या तणावाला अनेकदा 'सायलेंट किलर' म्हटले जाते. युरोपमधील घरे, ऑफिसेस आणि शाळांचे बांधकाम अशा तापमानाचा सामना करेल अशा पद्धतीने बांधलेल्या नाहीत," असे ते म्हणाले.
हवामान बदलामुळे जशी तीव्र तापमानाची समस्या तीव्र होत चालली आहे, तशीच गेल्या दोन दशकांत ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत नाट्यमयरीत्या वाढ झाली आहे, असेही संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी फ्रान्सच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशामध्ये बुधवारपासून अपेक्षेपेक्षा सुमारे १,००० अधिक मृत्यू झाले आहेत. उष्णतेच्या लाटा आता केवळ हवामानातील बदलापुरत्या राहिलेल्या नाहीत तर हवामान बदल आणि वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे त्या त्या शहरातील सार्वजनिक आरोग्यासाठीही हा सर्वात मोठा धोका म्हणून तो पुढे येत आहे, याची जाणीव युरोपची ही हिट्ट वेव्ह करून देत आहे.