

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील गॅस संकट आता लोकांना धोकादायक जुगाड करण्यास भाग पाडत आहे. ‘एआरवाय न्यूज’च्या माहितीनुसार, नागरी भागात परिस्थिती इतकी बिकट आहे की, लोक गॅस पिशव्यांमध्ये भरून साठवून ठेवत आहेत. विशेषतः, ओरंगी टाऊन आणि मोमिनाबादसारख्या भागात हे द़ृश्य सर्रास पाहायला मिळत आहे. लोक गॅस भरण्यासाठी खास तयार केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत आहेत. जेव्हा थोड्या वेळासाठी गॅसचा पुरवठा होतो, तेव्हा लोक या पिशव्यांत तो भरून घेतात आणि नंतर त्याचा वापर स्वयंपाकासाठी करतात.
तज्ज्ञांनी ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, गॅसने भरलेल्या या पिशव्या म्हणजे चालते-फिरते बॉम्बच आहेत. थोडीशी ठिणगी, उष्णता किंवा घर्षणामुळे मोठा स्फोट होऊ शकतो; विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात याचा धोका जास्त आहे. यामुळे आग लागण्याची शक्यताही वाढली आहे. हा जीवघेणा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने आणि गॅस कंपन्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.