

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केरळच्या किनाऱ्याजवळ आग लागलेल्या मालवाहू जहाजातून भारताने १२ चिनी नागरिकांना वाचवले होते, असा उल्लेख करत ‘भारताचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही,’ अशी कृतज्ञता चीनने व्यक्त केली आहे. भारतातील चीनचे नवे लष्करी मुत्सद्दी (मिलिट्री डिप्लोमॅट) यू जियान यांनी भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत.
नवी दिल्लीत मंगळवारी चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यू जियान यांनी ही माहिती दिली. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे भारत-चीन संबंध पुन्हा एकदा सुधारण्याच्या मार्गावर आले आहेत, असेही ते म्हणाले. वास्तविक, ९ जून २०२५ रोजी सिंगापूरचा ध्वज असलेले ‘एमव्ही वान हाय ५०३’ हे कंटेनर जहाज केरळच्या अझिक्कल किनाऱ्यापासून सुमारे ४४ सागरी मैल अंतरावर स्फोट होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. हे जहाज कोलंबोहून न्हावा शेवाकडे (मुंबई) जात होते. त्यावर चालक दलाचे २२ क्रू मेंबर तैनात होते. जहाजावर २,१२८ टन इंधन आणि शेकडो कंटेनर्स लादलेले होते.
जहाजातील काही कंटेनर्समध्ये धोकादायक रसायने आणि इतर धोकादायक साहित्य होते. आग लागल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने जहाजाला दोरीने बांधून किनाऱ्यापासून दूर खेचले. जहाजावर चीन आणि तैवानचे एकूण १४ नागरिक होते. यामध्ये ८ चीनचे आणि ६ तैवानचे होते. बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाची ५ जहाजे, २ विमाने आणि १ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यावेळी भारताने केलेल्या मदतीबद्दल चिनी दूतावासाने भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे आभार मानले होते. सिंगापूरच्या उच्चायुक्तांनीही भारताचे कौतुक केले होते.