पुढारी ऑनलाईन डेस्क : शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगला देशमधील आंदोलनाचे सत्र सुरूच राहिले आहे. आज (दि. १० ऑगस्ट) आंदोलकांनी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे, असे वृत्त बांगला देशमधील 'द डेली स्टार'ने दिले आहे. निदर्शनादरम्यान आंदोलकांनी मुख्य न्यायाधीश आणि अपील विभागाला दुपारी 1 वाजेपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी करत राजीनामा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. ( The mass protests in Bangladesh )
आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत विद्यार्थी आणि वकिलांसह शेकडो आंदोलक सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात जमा होऊ लागले. निदर्शनादरम्यान त्यांनी सरन्यायाधीश आणि अपील विभागाला राजीनामा देण्याचा इशारा दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी दिलेल्या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. बांगलादेशमध्ये आंदोलकांनी न्यायालय परिसराला घेराव घातल्यानंतर सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.
देशभरातील सर्वोच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्य न्यायमूर्ती माध्यमांना सांगितले. शनिवारी सायंकाळपर्यंत राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांना राजीनामा पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अंतरिम सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार असिफ महमूद यांनीही "मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांचा बिनशर्त राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
1971 च्या युद्धात सहभागी झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित असलेल्या वादग्रस्त कोटा प्रणालीवर विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केल्यानंतर शेजारच्या देशात अराजकता पसरली. काही दिवसांमध्ये संपूर्ण देशभरात या आंदोलनाचा वणवा पसरला. सर्वोच्च न्यायालयाने नोकऱ्यांमधील आरक्षण 5% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बांगला देशमध्ये भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले. दरम्यान, सोमवार ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे. यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे.