पुढारी ऑनलाईन डेस्क : शेजारील राष्ट्र बांगला देशमधील (Bangladesh) अराजकतेचा परिणाम आता भारतावर होवू लागला आहे. सीमेवरुन भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा एका मोठा गटाचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) (Border Security Force) उधळला असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
बीएसएफच्या अधिकार्यांनी बुधवारी सांगितले की, पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बांगलादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बीएसएफच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वेकडील राज्यातील अनेक ठिकाणांहून भारतीय बाजूने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 120-140 बांगलादेशी नागरिकांना रोखले. पश्चिम बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगला देशमधील सुरक्षा दल 'हाय अलर्ट'वर आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट भारतीय ओळख दस्तऐवज वापरून बेकायदेशीर स्थलांतर करण्याच्या प्रयत्नांच्या शक्यतेबद्दल सतर्क करण्यात आले आहे.बांगलादेशी ग्रामस्थांचा एक गट आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पोहोचला. यामुळे येथे थोडा गोंधळ झाला; परंतु BSF जवानांनी तात्काळ कारवाई केली. शांततेने परिस्थिती सोडवली. भारतात घुसरखोरीच्या प्रयत्नात असणार्यांना माघारी पाठवले. पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर, दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यांसह एकूण ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेपैकी ९३२.३९ किमीचे सुरक्षा बीएसएफ करते.