

ढाका; वृत्तसंस्था : किरकोळ घटना वगळता बांगला देशातील 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. बांगला देश वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता मतदान संपले आणि मतमोजणीही सुरू झाली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत 47.91 टक्के मतदान झाले. राष्ट्रीय जनमत चाचणीसाठीही मतदान झाले. जुलैच्या सनदेचा स्वीकार करायचा की नाही याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, मुंशीगंज येथील मतदान केंद्रावर झालेल्या क्रूड बॉम्बस्फोट प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. खुलना येथील मतदान केंद्राबाहेर जमात-ए-इस्लामी कार्यकर्त्यांशी झालेल्या संघर्षात बीएनपी नेते मोहिबुझ्झमान कोची यांचा मृत्यू झाला.
या निवडणुकीत तरुणांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. जवळजवळ निम्मे मतदार 18 ते 37 वयोगटातील आहेत. सुमारे 4.57 दशलक्ष मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केले. देशभरातील 36,000 मतदान केंद्रांवर 47.91 टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात 2000 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये केवळ 109 महिला आहेत, असे डेली स्टार वृत्तपत्राने म्हटले आहे.
शेख हसीना यांच्या अवामी लीगची नोंदणी निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. 2009 नंतर देशातील खर्या अर्थाने पहिली निवडणूक म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
देशाची लोकसंख्या सुमारे 17 कोटी आहे. त्यातील 12 कोटी 70 लाखांहून अधिक लोक मतदान करण्यास पात्र आहेत. देशभरात संसदेच्या जागांसाठी एकूण 1,981 उमेदवार रिंगणात आहेत. ही प्रक्रिया नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारद्वारे पार पाडली जात आहे. मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांचे आश्वासन या सरकारने दिले आहे.
निवडणुकीतील जमात-ए-इस्लामी आणि बीएनपी या दोन प्रमुख पक्षांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. जमातचे शफीकुर रहमान यांनी बनावट मतदान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे, असे ‘डेली स्टार’ने वृत्त दिले आहे. बीएनपीचे तारिक रहमान यांनी, काही अवांछित घटना घडल्या असून, मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न दिसून आल्याचे सांगितले.