

ढाका : बांगलादेशच्या राजकीय पटलावर मोठी घडामोड घडली असून तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, रहमान यांच्या नेतृत्वाखालील या नव्या मंत्रिमंडळात एका हिंदू आणि एका बौद्ध नेत्याला स्थान देण्यात आले आहे. निताई रॉय चौधरी आणि दीपेन दीवान चकमा अशी या दोन नेत्यांची नावे आहे. त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
निताई रॉय चौधरी हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) धोरण-निश्चिती करणाऱ्या सर्वोच्च स्थायी समितीचे सदस्य आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष असण्यासोबतच ते वरिष्ठ सल्लागार आणि रणनीतीकार म्हणूनही ओळखले जातात. चौधरी यांनी पश्चिम मागुरा मतदारसंघातून 'जमात-ए-इस्लामी'च्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. जानेवारी १९४९ मध्ये जन्मलेले निताई रॉय चौधरी हे बांगलादेशातील एक प्रतिष्ठित वकील असून त्यांनी यापूर्वीही संसदेचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
दीपेन दीवान चकमा हे दक्षिण-पूर्व रांगमती पर्वतीय जिल्ह्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव करून ही जागा जिंकली. चकमा हे बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक समुदायातील असून ते पेशाने वकील आणि राजकारणी आहेत. ८ जून १९६३ रोजी रांगमती येथे जन्मलेले दीपेन हे राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे माजी सल्लागार सुबिमल दीवान यांचे पुत्र आहेत.
बांगलादेशच्या नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाच्या एकूण चार उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली होती. यामध्ये दोन हिंदू आणि दोन बौद्ध नेत्यांचा समावेश होता. विजयी झालेले चारही नेते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) उमेदवार होते. हिंदू नेत्यांमध्ये गायेश्वर चंद्र रॉय आणि निताई रॉय चौधरी, तर बौद्ध नेत्यांमध्ये सचिन प्रू आणि दीपेन दीवान चकमा यांचा समावेश होता. यापैकी चौधरी आणि चकमा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर तारिक रहमान यांनी मंगळवारी (दि. १७) बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी जुन्या परंपरेला छेद देत 'बंगभवन' ऐवजी जातीय संसदेच्या 'साउथ प्लाझा' येथे ६० वर्षीय रहमान यांना शपथ दिली.
गेल्या दोन दशकांपासून बांगलादेशची सत्ता दिवंगत खलिदा झिया आणि शेख हसीना यांच्याकडेच फिरत होती. २००९ ते २०२४ या काळात शेख हसीना यांची सत्ता होती. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर बांगलादेशच्या सरकारचे नेतृत्व एका पुरुष नेत्याच्या हाती आले आहे, ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
पंतप्रधान तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळात एकूण ४९ मंत्र्यांचा समावेश असून त्यात २५ कॅबिनेट आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर काही तासांतच मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.