

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात राजकीय अस्थिरता असतानाच कॅनडा सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना कॅनडा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ( Hardeep Nijjar murder case ) या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ फेब्रुवारी रोजी कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी दोन्ही देशांमध्ये कमालीची कटुताही निर्माण झाली होती.
१८ जून २०२३ रोजी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निज्जरला भारतात वॉन्टेड घोषित करण्यात आले. तो १९९७ मध्ये कॅनडाला पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध भारतात डझनभराहून अधिक खून आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाचे गुन्हे दाखल आहेत. तरीही कॅनडाच्या सरकारने निज्जरवर कोणतीही कारवाई केली नाही. २०२३ मध्ये निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये एक नवीन वाद निर्माण झाला. निज्जरच्या हत्येबाबत कॅनडा सतत भारताकडे बोट दाखवत आहे आणि गंभीर आरोप करत आहे.निज्जर हत्या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२) आणि करणप्रीत सिंग (२८) या भारतीय नागरिकांना अटक केली होती. हे तिघेही एडमंटनमध्ये राहत होते. खूनचा कट रचणे अणि खून प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आरोपी अमरदीप सिंग (२२) याला ११ मे रोजी अटक करण्यात आली होती. अमरदीप सिंगवर प्रथम खून आणि खूनाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
निज्जर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केल होता. यावर १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पहिली सुनावणी झाली होती. मात्र यानंतरच्या सुनावणीला पोलीस हजर राहिले नाहीत. अखेर या प्रकरणी पोलिसांचा दृष्टिकोन पाहून सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींना जामिनावर मुक्त केले आहे. कॅनडातील सरकारी कागदपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, निज्जर हत्या प्रकरणातील आरोपींवरील कार्यवाही स्थगिती देऊन सोडण्यात आले आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये निज्जरच्या हत्येवरून कॅनडाने थेट भारताला आव्हान दिले, भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर राजनयिकांना निज्जरच्या कथित हत्येशी जोडले. तसेचव या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध खटला भरण्यास पात्र असल्याचे सांगितले. निज्जरच्या मृत्यूमध्ये भारत सरकारचे एजंट सामील होते, असा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने कॅनडाने केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. निज्जर हत्येनंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.