

नवी दिल्ली/काठमांडू; पुढारी वृत्तसेवा : नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या जलप्रलयामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला असून या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो नागरिक आणि परदेशी पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळच्या 'राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण व व्यवस्थापन प्राधिकरणा'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, स्थानिक नागरिक, सुरक्षा रक्षक आणि देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १५०० लोक बेपत्ता आहेत. यामध्ये ६४४ पर्यटकांसह तब्बल २८८ भारतीय समावेश आहे.
आतापर्यंत ४०० मृतदेह सापडले आहेत. नेपाळ पोलिस प्रवक्ते अबी नारायण काफ्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, चितवनमध्ये १२१, नवलपरासी पूर्वमध्ये ७४, धाडिंग व गोरखा येथे प्रत्येकी २९, नुवाकोटमध्ये २८, तनहुनमध्ये १९, रसुवामध्ये १७ आणि नवलपरासी पश्चिममध्ये १५ मृतदेह हाती लागले आहेत. मृतदेहांची मोठी संख्या त्यांच्या संरक्षणासाठी जागेची कमतरता निर्माण करत आहे. चितवनच्या शवागारात केवळ ५० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य तसेच बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
त्रिशुली-१ वीज प्रकल्पात काम करणाऱ्या ७३ भारतीयांसह २८८ भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. पुरात अडकलेल्या २१ भारतीयांना वाचवण्यात आले आहे. खराब झालेले रस्ते आणि इतर मार्गांमुळे अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. बचावलेल्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे त्रिशुली बाजारात नेले जात आहे.
डीआरडीओचे माजी प्रमुख जी. सतीश रेड्डीसह ३१ यात्रेकरू तिबेटमध्ये अडकले
डीआरडीओचे माजी प्रमुख जी. सतीश रेड्डी आणि त्यांच्या पत्नीसह ३१ यात्रेकरू तिबेटमध्ये अडकले आहेत. ते कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. खराब हवामानामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. अडथळा आलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे.
बचावलेले भारतीय मैथिली बॅरेक्समध्ये
नेपाळमधील पूर आणि भूस्खलनानंतर रसुवा येथून वाचवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना नुवाकोट येथील मैथिली बॅरेक्समध्ये ठेवण्यात आले आहे. या सुविधेत सध्या आपत्तीग्रस्तांना ठेवण्यात आले आहे. मैथिली बॅरेक्स हे नेपाळ लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असून, त्याचा उपयोग मदत आणि बचाव कार्यांसाठी मुख्य तळ म्हणून केला जात आहे.