नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सततच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज पुरेसे चालत नाही आणि याच्या परिणामी युवा खासदारांना जे शिकावयास हवे, ते शिकायला मिळत नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
संसदेत आम्हाला बोलावयास मिळत नाही, अशी वेदना युवा खासदारच नव्हे तर विरोधी पक्षांचे खासदार देखील बोलून दाखवितात. अर्थात सदनाचे कामकाज सुरळीतपणे चालत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. यामुळे आपणा सर्वांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत सर्व नेत्यांनी व पक्षांच्या गट नेत्यांनी ही वेदना समजावून घेउन संसद चालू द्यावी. संसदेची उत्पादकता वाढली तर त्यात देशाचे भले आहे, हे लक्षात घ्यावे. हिवाळी अधिवेशनात चर्चेचा स्तर उंचावेल, अशी आपणास आशा आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण याआधी आपण 15 ऑगस्टपूर्वी भेटलो होतो. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली होती. आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. आपण अशावेळी भेटत आहोत की जेव्हा देशाला जी-20 राष्ट्रसमूहाचे अध्यक्षपद भेटलेले आहे. जी-20 चे अध्यक्षपद मिळणे ही मोठी संधी आहे. जगासमोर भारताची क्षमता दाखविण्याची हीच वेळ आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.