Indian Science Congress : विज्ञानातून महिला व महिलांच्या सहभागातून विज्ञान सक्षमीकरण व्हावे – पंतप्रधान मोदी
पुढारी ऑनलाइन डेस्क : Indian Science Congress : विज्ञान हे मानवतेच्या कल्याणासाठी असायला हवे. ते संशोधकांच्या लॅबमधून निघून लँण्डपर्यंत (जमिनीपर्यंत) पोहोचायला हवे. नवनव्या वैज्ञानिक पर्यायांचा शोध घ्यायला हवा. सर्वात महत्त्वाचे विज्ञानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावे एवढेच नव्हे तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण व्हायला हवे, आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षांच्या विस्तारासाठी सामुहिक प्रयत्न महत्वाचे असून विज्ञान, संशोधनाला गती देणे हेच आमचे ध्येय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. ते नागपुरातील भारतीय विज्ञान काँग्रेसला व्हर्च्युअलरित्या संबोधित करत होते.
Indian Science Congress : नागपूरमध्ये १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन झाले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअली सहभाग घेऊन संबोधित केले. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती.
यावेळच्या भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम 'सस्टेनेबल डेवलपमेंट' (शाश्वत विकास ) ही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या थीममध्ये आज महिला सक्षमीकरणाचा मुद्दा जोडला. तसेच विविध मुद्यांची मांडणी केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "पुढील 25 वर्षांमध्ये भारत ज्या उंचीवर असेल त्यात भारताची वैज्ञानिक शक्तिची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण ठरणारी असेल. जेव्हा विज्ञानात समर्पण वृत्तीसह देशसेवेचा संकल्प जोडला जातो तेव्हा त्याचे परिणाम अभूतपूर्व असतात."
Indian Science Congress : या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विज्ञानातील दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला. ते म्हणाले, आज 21 व्या शतकात भारतात दोन गोष्टी मोठ्या प्रमाणात आहे ती म्हणजे डेटा आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञान. हे भारतीय विज्ञानाला निश्चितच नवीन उंचीवर नेऊ शकतात. डेटा विश्लेषणाचे क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. हे माहितीचे योग्य विश्लेषण करून त्याचे उत्तम ज्ञानात रुपांतर करण्यात मदत करते.
Indian Science Congress : आजचा भारत वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. त्याचे परिणाम आपण पाहत आहोत. विज्ञान क्षेत्रात भारत झपाट्याने जगातील अव्वल देश बनत आहे. विज्ञान क्षेत्रात भारताने जगातील पहिल्या १० देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. २०१५ पर्यंत १३० देशांमध्ये भारत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये ८१ व्या स्थानावर होता. २०२२ मध्ये, आम्ही ४० व्या स्थानावर झेप घेऊ. तर Phds आणि स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भारत पहिल्या तीन देशांमध्ये आहे, अशी माहितीही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
Indian Science Congress : विज्ञानाचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा लॅबोरेटरीमधून लँडपर्यंत पोहोचेल
पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान हे मानवतेच्या कल्याणासाठी असायला हवे असे सांगत पुढे म्हटले की, विज्ञानाचे फायदे सामान्य जनतेला तेव्हाच मिळू शकतील जेव्हा विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर पडून जमिनीपर्यंत पोहोचेल. जागतिक पातळीपासून स्थानिक तळागाळापर्यंत पोहोचेल जेव्हा ते जर्नलपासून लोकांपर्यंत पोहोचेल आणि जेव्हा संशोधनातून वास्तविक जीवनावर त्याचा प्रभाव पडेल तेव्हाच विज्ञानाचे प्रयत्न मोठ्या यशात बदलू शकतील.
Indian Science Congress : विज्ञानातून भारत आत्मनिर्भर व्हायला हवा
देशाच्या गरजा पूर्ण करणे, (उदाहरणार्थ उर्जा क्षेत्र) तसेच देशाला आत्मनिर्भर बनवणे या दृष्टिकोनातून भारतीय विज्ञानाचा प्रवास व्हायला हवा. विज्ञानाच्या माध्यमातून भारताला स्वावलंबी बनवणे ही आपल्या वैज्ञानिक समुदायाची मूळ प्रेरणा असली पाहिजे. त्या दृष्टीने भारतातील विज्ञानाची आवड असणा-या विद्यार्थ्यांचा टॅलेंट हंट सारख्या आयोजनातून शोध घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण
भारतीय विज्ञान काँग्रेसची यावेळीची थीम ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट ( शाश्वत विकास ) ही आहे. या थीममध्ये पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा जोडला आहे. ते म्हणाले, "आज महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. त्यासाठी विज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. मात्र, केवळ विज्ञानातून महिला सक्षमीकरण नव्हे तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण व्हावे."
हेही वाचा :

