

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना कोलंबोच्या के. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडियाचे नेतृत्व या सामन्यात रोहित शर्माकडे असेल. तर श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी दासुन शनकावर असणार आहे. दरम्यान, आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया एक पाऊल दूर आहे. तर श्रीलंकेने यापूर्वी सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देणे हे दोन्ही संघांचे वैशिष्ट्य आहे. सुपर ४ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेसमोर २१३ धावा वाचवल्या होत्या. तर श्रीलंकेने पाकिस्तानच्या विरोधात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. त्यामुळे आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात दोन्हीही तुल्यबळ संघ आमने-सामने असणार आहेत. (IND Vs SL Asia Cup Final)
आशिया चषकात शुभमन गिलने चागंली कामगिरी केली. ही भारतासाठी महत्वपूर्ण बाब आहे. गिलने बांगला देशविरोधात शतकी खेळी केली. शिवाय, केएल. राहुल आणि विराट कोहलीनेही पाक विरोधात शतकी खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र, रवींद्र जडेजा या आशिया चषकात नावाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. त्याने चांगली गोलंदाजी केली. परंतु, फलंदाजी करताना त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. (IND Vs SL Asia Cup Final)
जडेजा फॉर्मशिवाय भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण चिंतेचा विषय बनले आहे. या आशिया चषकात भारतीय संघाला चांगले क्षेत्ररक्षण करता आलेले नाही. बांगला देशविरोधात केएल. राहुल, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने खराब क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. नेपाळ विरुद्धच्या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी अनेक झेल सोडले होते. (IND Vs SL Asia Cup Final)
श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सुपर-4 फेरीत गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महिश तिक्षणा जखमी झाला. या सामन्याच्या 34 व्या षटकात तो जखमी झाला. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि फिजिओकडून वैद्यकीय उपचार घेतले. यानंतर तो मैदानात परतला आणि गोलंदाजीही केली. परंतु, अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी थोडे कठीण असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर श्रीलंकन बोर्डाने आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आणि सांगितले की, तिक्षणा याच्या उजव्या हाताला ताण आला आहे. (IND Vs SL Asia Cup Final)