पणजी ः पुढारी वृत्तसेवा राज्यात शुक्रवारी मान्सून दाखल झाल्यानंतर शनिवारी मान्सून दमदार कोसळू लागला आहे. येत्या बुधवारपर्यंत (15 जून) पाऊस असाच कोसळत राहिल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अंगाची लाही लाही करणारा उष्मा सध्या गायब झालेला आहे. सर्वत्र आल्हाददायी गारवा निर्माण झालेला आहे.
पावसामुळे राज्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. गोमंतकीयांना पुढील चार दिवस जोरदार पावसाच्या सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग सहा दिवस पाऊस सुरू राहिल्यास राज्यातील नदी व नाल्यांना पूर येईल आणि नदीकाठच्या घरांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. गतवर्षी राज्यातील अनेक नद्यांना पूर येऊन शेकडो लोकांची घरे वाहून गेली तसेच वित्त हानी झाली होती. यंदा तसा प्रकार घडू नये यासाठी सरकारची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.
सलगच्या पावसामुळे अनेक भागात गटारातील कचरा रस्त्यावर येऊन रस्त्याना ओंगळवाणे रूप प्राप्त झाले. काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. रस्त्याकडेचे मातीचे ढिगारे रस्त्यावर पसरल्याने रस्ते चिखलमय झाले. काही जागी रस्त्याकडेचे लहान लहान दरडी कोसळण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. वाहनचालकांना भर पाण्यातून वाहने चालवण्याची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
ज्या भागात जोरदार पावसामुळे पूर येतो त्या भागातील नागरिक सततच्या पावसामुळे धास्तावले आहेत. सलग चालू असलेल्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढून पुराचे पाणी घरात तर येणार नाही ना, अशी भिती नदीकाठच्या नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे नदीकाठचे नागरिक जीव मुठीत धरून रात्र घालवत आहेत. काहींनी आपल्या लहान मुलांना जवळच्या पाहुण्याकडे पाठवले आहे.
आकड्यातील पाऊस मिलीमीटरमध्ये
पणजी – 40.5
मुरगाव -50.0
म्हापसा – 40.5
जुने गोवे 10.0