

पणजी : क्षयरोगाचे (टीबी) निदान लवकर झाल्यास योग्य आहार आणि उपचारांती क्षयरोग पूर्णतः बरा होऊ शकतो. यासाठी क्षयरोगाची लक्षणे दिसताच निदान करून घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारतर्फे मागील 5 वर्षांपासून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष विभाग सक्रिय आहे.
आरोग्य विभागाचे टीबी अधिकारी डॉ. मनीष गावणेकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती करण्यासाठी क्षयरोग निवारण दिनाचे आयोजन केले जाते. डॉ. गावणेकर म्हणाले, ’डिप्रेशियटेड टीबी केअर’ या युनिटमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. केवळ आपल्या राज्यात मायक्रोस्कोपिक चाचण्यांऐवजी ’नेट’ चाचण्यांच्याद्वारे टीबीचे निदान केले जाते. या चाचण्या उपचारासाठी अधिक उपयुक्त असून त्या उपचारादरम्यान वापरल्या जाणार्या औषधांसाठी सकारात्मक आहेत की नाही? ह्या स्पष्ट करणार्या आहेत. याचा रुग्णांसाठी अधिक फायदा होतो.
पंधरा दिवसांचा सलग खोकला, ताप, वजन कमी होणे आणि रात्री घाम सुटणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णाने तातडीने निदान करणे अत्यावश्यक असते. रुग्ण चाचण्यांसाठी पुढे येत नसल्याचा अनुभव आहे. यामुळे उपचार आणि उपचार पद्धती अधिक क्लिष्ट बनते. यासाठी रुग्णांनी निदानासाठी तातडीने पुढे येणे गरजेचे आहे. निदानानंतर रुग्णांवर मोफत अत्याधुनिक औषध उपचार केले जातात.याशिवाय पंतप्रधान टीबी मुक्ती अभियानाद्वारे विशेष सहाय्य केले जाते. याबरोबर निश्चय पोषण आहार योजनेंतर्गत प्रति रुग्ण प्रतिमहिना एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. हे पैसे रुग्णांनी पोषणयुक्त आहारासाठी वापरणे अपेक्षित आहे. टीबी रुग्णांनी सकस आहार, योग्य उपचारासह तोंडाला मास्क वापरणे गरजेचे आहे. या रुग्णांना 6 महिन्यांचे उपचार दिले जातात. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांचीही सरकारतर्फे मोफत तपासणी केली जाते. आणि त्यांनाही आवश्यकता भासल्यास 1 ते 3 महिने उपचार दिले जातात.
राज्यात दरवर्षी सुमारे 2 हजार क्षयरोगी रुग्ण आढळतात. सध्या उपचार चालू असलेल्या रुग्णांची संख्या 1300 ते 1400 च्या आसपास आहे. सध्या राज्यात 2 हजार 68 रुग्ण आहेत. या रुग्णांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांतर्गत विशेष रुग्ण आणि रुग्णालय आहे. सर्व रुग्णांना मोफत आरोग्य सेवा आणि उपचार केले जातात. राज्यात सध्या टीबी रुग्णांचा मृत्युदर हा 8 ते 9 टक्के आहे. राज्यात हा वाढलेला दिसतो, याचे प्रमुख कारण औषध उपचारांसाठी रुग्णांचे सहकार्य हे आहे. यात उच्च मधुमेह (हाय डायबिटीस) आणि मद्यपान सेवन करणारे रुग्ण हे आहेत. त्यात अशक्तपणा आणि कुपोषण यामुळे हे प्रमाण वाढत असल्याची माहिती डॉ. मनीष गावणेकर यांनी दिली.