

पणजी : दिल्लीतील माफियांपासून गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित ठेवत गोव्याची अस्मिता जपण्यासाठी आरजी पक्ष नव्या जोमाने पुन्हा कार्य सुरू करणार आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी अनेक प्रश्न मांडले. मात्र, विरोधी पक्षांनी त्याला कधी साथ दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतून आरजी बाहेर पडल्याचे पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी जाहीर केले. येत्या विधानसभा निवडणुकीत निवडक जागांवरच उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचेही परब म्हणाले.
पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब बोलत होते. ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने 38 जागा लढविल्या होत्या. निवडणुकीसाठी पक्षाचे 17 लाख रुपये खर्च झाले. मागील 7 महिने पक्षाचे कार्य ठप्प होते. गोमंतकीयांचे प्रश्न समजून घेताना कशा पद्धतीने पुढील वाटचाल करावी, याबाबत चिंतन करण्यासाठी मी विश्रांती घेतली होती. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन राजकारण तसेच पुढील वाटचालीसाठी व्युहरचना आखण्यासाठी काही काळ शांतपणे विचार करण्याची गरज होती. यासाठीच मागील 7 महिने आरजीचा कोणत्याही आंदोलनात सहभाग नव्हता. मी सुद्धा सक्रीय नव्हतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
ते म्हणाले, आमदार वीरेश बोरकर हे आरजी सोबतच आहे. विधानसभेत त्यांनी राज्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांना अन्य विरोधी पक्षांची साथ लाभली नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात असलेले आप व काँग्रेस हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. गोमंतकीयांच्या जमिनी व अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठीचा लढा सुरू ठेवण्यासाठीच अन्य विरोधी पक्षांपासून वेगळेच राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सदस्यता मोहीम तसेच निधी संकलन मोहीम नव्याने सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मोजक्याच जागांवर पक्ष उमेदवार उभे करणार आहेत. अन्य जागांवर कोणाला पाठिंबा द्यावा की देऊ नये, याचा निर्णय भविष्यात घेतला जाईल, असेही ते म्हणाले.