डिचोली : विठ्ठलापूर-साखळी येथे 12 वर्षीय मुलाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून करून संशयित चंदू पाटील (मूळ रा. शेगाव, महाराष्ट्र) हा पसार झाला आहे. मालकाने कामावरून काढल्याच्या रागातून चंदू याने नवीन आलेल्या कामगाराच्या लहान भावाचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मृत मुलगा तीन दिवसांपूर्वी भावाकडे आला होता
झोपलेल्या मुलाला उचलून नेत घातला डोक्यात दगड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर अली (10, उत्तरप्रदेश) आपल्या भावासोबत तीनच दिवसांपूर्वी बाक्रे यांच्याकडे गुरांच्या गोठ्यात काम करण्यासाठी आला होता. काम करून समीरला शिक्षण देण्यासाठी मोठ्या भावाने त्याला गोव्यात आणला होता. मालकाने गोठ्या जवळील खोलीमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. शनिवारी 21 रोजी मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या समीरला उचलून चंदू याने 50 मीटर अंतरावर नेले. येथे त्याच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून केला. समीर याचा खून केल्यानंतर चंदू हा आपल्याच दुचाकीने थिवी रेल्वे स्टेशनपर्यंत आला व तिथून तो रेल्वेने पसार झाला.
रविवारी पहाटे 5 वाजता समीरचा भाऊ झोपेतून जागा झाला. त्याला खोलीत समीर न दिसल्याने त्याने भावाचा शोध घेतला. त्यावेळी खोलीपासून काही अंतरावर मागच्या बाजूला समीर रक्तबंबाळ स्थितीत पडलेला त्याला आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने त्याला आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केले. संशयित चंदू पाटील हा फिर्यादी बाक्रे यांच्याकडे कामाला होता. मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. त्यातच तो कामचुकारपणा करू लागल्याने त्याला बाक्रे यांनी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर त्याने अनेकदा कामावर पुन्हा घेण्यासाठी मालकाकडे विनवणी केली. मात्र, बाक्रे यांनी नवीन व्यक्तीला कामावर ठेवले होते. समीरच्या भावामुळेच आपला रोजगार गेल्याचा राग धरून चंदूने समीरचा खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
समीर याचा खून केल्यानंतर संशयित आरोपी चंदू पाटील हा रेल्वे मार्गे महाराष्ट्रात पसार झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.