

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कार्नाव्हाल (कार्निवाल अथवा कार्निव्हल नव्हे) हा नेमका कुणाची परंपरा जपणारा (मूळ कुणाचा?) उत्सव आहे? ही गोव्याची भारतीय परंपरा आहे का? असा प्रश्न प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.
काहीजण स्वार्थ साधण्यासाठी, परकीय विकृतीची, आपली कधीच नसलेली, गोवामुक्तीनंतर संधिसाधू राजकारण्यांनी पोर्तुगीजांनी जाता जाता केलेली ही घाण, ही नवी चुकीची परंपरा आमच्या माथ्यावर थोपण्याचा प्रयत्न केलेला आहे, असेही वेलिंगकर यांनी म्हटले आहे. पोर्तुगीजांनीही आपल्या ४५० वर्षांच्या जुलमी सत्ताकाळात कधीच हा उत्सव आताच्यासारखा मिरवला नाही.
राजकीय स्वार्थासाठी, चक्क ही गोव्याची परंपरा बनवता ? आपल्या पवित्र संस्कृतीचा माग आहे म्हणून बाजारु प्रचार करून, गोव्याची आणि देशाची दिशाभूल कशाला करता? हा पोर्तुगीज विकृतोत्सव काँग्रेसने गोव्यात फक्त ५ शहरांपर्यंतच पसरवला होता. असे सतेचे तुकडे तोंडावर फेकून संस्कृतीचे ठेकेदार संघटनांनीही तोंडातून ब्र काढू न देता गप्प बसवण्यात राजकारणी यशस्वी झाले, तरी लक्षात ठेवा की गोव्याच्या भारतीय मूळ संस्कृतीशी, मातृभाषांच्या सन्मानाशी घाणेरडे राजकारण करू नका! जनता देशोधडीला लावील ! तेवढा स्वाभिमान गोव्यात अजून शिल्लक आहे, असेही वेलिंगकर यांनी म्हटले आहे.