पणजी : भारत माता की जय संघटनेचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर झालेले आंदोलन-प्रति आंदोलनामुळे तणावयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून राज्यातील भाजप सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
गांधी यांनी म्हटले आहे की, निसर्गसौंदर्य आणि आदरातिथ्य ही खास वैशिष्ट्ये असणार्या गोव्यात भाजप जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहे. संघाच्या माजी नेत्याने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे गोव्यात अशांतता निर्माण झाली आहे. भाजपच्या राजवटीत सामाजिक ऐक्यावर सातत्याने आघात होत आहे. भाजप सरकारकडून गोव्यात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी सुरू आहे. संवेदनशील भूभागाचा र्हास सुरू आहे. हरित भूमीचे बेकायदा रूपांतर होत असताना भाजप सरकार सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी भूमिका घेत आहे. मूळ विषयांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. परंतु, लोक भाजपच्या अजेंड्याला ओळखून आहेत. या विरोधात लोक एकजुटीने उभे राहतील असा मला विश्वास आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे.
संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ वरून राज्यातील पर्यावरणाच्या संदर्भात सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे की, आपल्या कार्यकाळात गोव्याचे पर्यावरणीय रक्षण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची इतिहासात नोंद होईल.