

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीमधील अंतर्गत आग पुन्हा एकदा उफाळून आली असून पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बोरकर हे घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप करताना नाईक यांनी त्यांना ' विश्वासघातकी' आणि 'चोर' अशी तीव्र विशेषणे लावली.
नाईक यांच्या मते, वीरेश बोरकर यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप गटातून बाहेर काढून त्याचा ताबा आदित्य देसाई यांच्याकडे सोपविला. तसेच पक्षाचे अधिकृत फेसबुक पेज, जीमेल खाते आणि यूट्यूब चॅनल यांच्यावरही बेकायदेशीररीत्या नियंत्रण मिळवल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी नाईक यांनी बोरकर यांच्या आमदारकीच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाईक म्हणाले की, आम्ही सर्वजण संस्थापक सदस्य आहोत. वीरेश बोरकर जेव्हा आमदार झाले, त्यावेळी त्यांना कसे बोलायचे हे देखील माहीत नव्हते. विधानसभा अधिवेशनात बोरकर हे केवळ चेहरा होते, तर त्यांच्या भाषणांची तयारी, राजकीय रणनीती आणि मार्गदर्शनाची जबाबदारी तत्कालीन आरजीपी अध्यक्ष मनोज परब सांभाळत होते.
मनोज आणि अजय रात्ररात्रभर त्यांच्या भाषणांची तयारी करायचे. नाईक यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चाना उधाण आले आहे. आरजीपीतील वाढता अंतर्गत संघर्ष आणि परस्पर आरोप-प्रत्यारोप यामुळे पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
बोरकर यांच्या भूमिकेकडे लक्ष...
दरम्यान, या गंभीर आरोपांवर आमदार बोरकर कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. बोरकर आरोपांना उत्तर देऊन आपली भूमिका स्पष्ट करणार की मौन बाळगणार, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.