पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आदिवासी (एसटी) समाजाने आपल्या मागण्यांसाठी अनेक वर्षे संघर्ष केला आहे. राज्यात अनेक वर्षे काँग्रेसचे सरकार असतानाही एसटी समाजाच्या मागण्यांकडे काँग्रेसने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे काँग्रेसने एसटी समाजाच्या हितासाठी नेमके काय केले, ते सांगावे, असे आव्हान आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी मंगळवारी दिले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी भाजपने एसटी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना तवडकर यांनी हे आव्हान दिले.
तवडकर म्हणाले की, आजपर्यंत एसटी समाजाला जे काही मिळाले आहे, ते केवळ भाजप सरकारच्या कार्यकाळातच मिळाले आहे.
गावडा, कुणबी, वेलीप समाजाला एसटीचा दर्जा २००३ मध्ये भाजप सरकारनेच दिला. एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रियाही भाजप सरकारच्या काळातच होत आहे. ते म्हणाले, राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेला काही प्रमाणात विलंब झाला असला, तरी एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची क्षमता केवळ भाजप सरकारमध्येच आहे. काँग्रेसने एसटी समाजाच्या प्रश्नावर भाजपला शिकवू नये, असेही तवडकर यांनी स्पष्ट केले.