

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीतील कांपाल लेकव्ह्यू कॉलनी परिसरातील तलावात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याची घटना समोर आली आहे. या तलावातील पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी मळा परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर आता कांपाल येथील तलावात तसाच प्रकार आढळून आला आहे. या घटनेमुळे तेथील स्थानकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या तलावातील पाण्याचे नमुने तपासण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.
प्रदूषण, सांडपाण्याचा प्रवेश किंवा पाण्यातील प्राणवायूची कमतरता ही या मासे मृत्यूमागील संभाव्य कारणे असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील जलस्रोतांच्या स्वच्छतेबाबत आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या तपास अहवालाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गुणवत्तेची सखोल चौकशी करा
प्रदूषण, सांडपाण्याचा प्रवाह, पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूची कमी पातळी किंवा इतर कोणते पर्यावरणीय घटक यास जबाबदार आहेत, हे निश्चित करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करावी, अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली आहे.
स्वच्छता मोहीम हाती
दरम्यान, तलावाच्या पाण्यात अनेक मृत मासे तरंगताना आढळले, ज्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि पणजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे व मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात येत आहेत.