

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पीक काढण्याच्या वेळीच नाशिक भागात पावसाचे आगमन झाल्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुढील काही दिवस कांद्याचा दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादित कांदा बाजारपेठेत येण्याच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. केंद्र सरकारने ४ हजार मेट्रिक टन कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.
त्याचबरोबर निर्यातबंदी केली तर दर अजूनही खाली येऊ शकतो. राज्यातील बाजारपेठेत ६५ रुपये किलो दराने कांदा विक्री करण्यात आली. हा दर ५५ रुपये प्रतिकिलो एवढी खाली येऊ शकतो. मात्र, त्यासाठी आणखी ३० दिवस वाट पहावी लागेल. कारण नवे उत्पादन उपलब्ध होण्यासाठी ३० दिवसांचा काळ लागतो.
श्रावण महिना सुरू झाल्यावर अकरा दिवसांच्या बाप्पाला निरोप देईपर्यंत राज्यात पालेभाज्यांची मागणी दुपटीने वाढते. त्यामुळे फलोत्पादन महामंडळाकडूनही दुप्पट खरेदी केली जाते. राज्यातील १७ वेगवेगळ्या मार्गावर महामंडळाच्या विक्री केंद्रावर मागणी वाढते.
ज्या ठिकाणी एक गाडी भाजीपाला पुरवठा केला जातो, तिथे चतुर्थीकाळात दोन गाडी माल पाठवला जातो. विशेषतः उत्तर गोव्यात या काळात मागणी वाढते. महामंडळाकडूनही लोकांना पुरेसा भाजीपाला उपलब्ध करून देण्यावर महामंडळाकडून भर दिला जातो.