

पणजी : पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परतणार्या भाविकांच्या कारला घाटकरवाडी कित्तवडे (आजरा) येथे अपघात झाला. यात मये, हातुर्ली येथील चौघे भाविक जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
हातुर्ली, मये (डिचोली) गोवा येथील भाविक सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पायी वारीने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणीही देवदर्शन घेतले. सोमवारी (दि.7) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे सर्व भाविक पंढरपूरहून आपल्या कारने आपल्या गावी परत येत असताना, आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील कित्तवडे फाट्यावर त्यांच्या कारला अपघात झाला. समोरून भरधाव येणार्या गाडीचा अंदाज न आल्याने कार चालकाने अचानक ब्रेक दाबला.
यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन पलटी झाली. या अपघातात रिमा रत्नाकर चोडणकर (वय 57) आणि स्नेहल शिवराम नागवेकर ( 62 वर्षे ) यांना गंभीर दुखापत झाली. तर दिव्या देवानंद कवठणकर (48 वर्षे ) आणि शिवराम नारायण नागवेकर ( 67 वर्षे,सर्व रा. हातुर्ली, मये, डिचोली ) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातस्थळ आंबोलीपासून 11 किलोमीटरवर आहे. सोबत असलेल्या गोव्यातील वारकर्यांच्या दुसर्या कारने सर्व जखमींना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. अदिती पाटकर आणि डॉ. महेश जाधव यांनी जखमींना प्रथमोपचारानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.