

हरमल ः हरमल किनारी पर्यटनस्थळावर काही फिरत्या लमाणी महिलांच्या मनमानी विरोधात देशी पर्यटकांमध्ये संतापाची लाट उसळली. पार्किंग जागेत पर्यटक गाडीतून उतरताच या महिलांचा घोळका त्यांच्या मागे लागत असून, बळजबरीने वस्तू विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत. महिला पर्यटकांना हात लावून ओढणे, अशा कृतींमुळे पर्यटक भयभीत होत आहेत.
पावसाळ्यात मोठ्या संख्येने देशी पर्यटक गोव्याला भेट देतात. मात्र, हरमल किनार्यावरील या अनुभवामुळे नको ते पर्यटन व नको तो हरमल समुद्रकिनारा, अशी प्रतिक्रिया काही पर्यटकांनी व्यक्त केली. या कृतीमुळे अमर बांदेकर प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे स्थानिक नागरिकांनी नमूद केले. यावेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या पर्यटनस्थळी 24 तास पोलिस पहारा असेल याची काळजी घ्यावी व पोलिसांनी कारवाईचे स्वातंत्र्य घ्यावे, अशी मागणी होत आहे. समेश माज्जी यांनी सांगितले की, काही लमाणी बायांची दादागिरी इतकी वाढली आहे की, कुणी जाब विचारल्यास त्या गटाने हुज्जत घालतात. त्यामुळे स्थानिक तसेच व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.