

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील कार्यस्थळावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महिला आणि बालकल्याण संचालनालयामार्फत राज्यभर जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक कार्यालयात आंतरिक तक्रार समिती (आयसीसी) स्थापन करणे, तसेच कार्यस्थळी लैंगिक छळ रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे.
याअंतर्गत राज्यभरात ठिकठिकाणी ५० जागृती शिबिरे आयोजित करण्यात आली असून यामध्ये २००० हून अधिक जणांनी यामध्ये सहभाग घेतल्याची माहिती संचालिका ज्योती देसाई यांनी दिली.
राज्यभरात याची जोरदार अंमलबजावणी सुरू असून याअंतर्गत 'शी बॉक्स पोर्टल' बद्दल माहिती देत महिलांना ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सोय, तक्रारींचे गोपनीय निवारण आणि सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचेही संचालिका देसाई यांनी नमूद केले. गोव्यातील सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण व छळमुक्त वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने राज्य महिला व बाल विकास संचालनालयाची व्यापक जनजागृती मोहीम सुरूच राहणार आहे.
या मोहिमेत जिल्हास्तरावर अधिकारी, स्थानिक तक्रार समित्या आणि विविध विभागांतील नोडल अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कार्यस्थळी लैंगिक छळ म्हणजे काय, तक्रार कशी करावी, आयसीसीची भूमिका काय असते आणि तक्रारींचे निवारण कसे केले जाते याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांची शी बॉक्स पोर्टलवर नोंदणी सुरू असून, प्रत्येक कार्यालयाने आपल्या आयसीसीची माहिती अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत कार्यरत स्थानिक समित्या आणि कार्यस्थळावरील अंतर्गत समित्या सुरक्षित व समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत.
महिलांमध्ये होतेय जागरूकता...
या शिबिरांमुळे महिलांमध्ये कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता वाढत असून, छळाविरुद्ध निर्भयपणे तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच सर्व कार्यालयांनी आयसीसी स्थापन करणे बंधनकारक असल्याची माहितीही देण्यात येत आहे.
महिलांना सुरक्षितेसाठी प्रयत्नशील
या मोहिमेमुळे राज्यात महिलांसाठी सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण होण्यास मदत होणार असून, प्रत्येक कार्यालयाने कायद्याचे पालन करून आयसीसी स्थापन करणे ही काळाची गरज असून कोणताही गैरप्रकार झाल्यास त्वरीत तक्रार नोंदवावी, असे आवाहन संचालिका ज्योती देसाई यांनी केले.