

पणजी : मागील काही वर्षांपासून अनेकांच्या पक्षविरोधी कारवाया सुरू आहेत. मला आणि वीरेश यांना वेगळे करण्याचे प्रयत्न काहींकडून सुरू आहेत. याबाबत वीरेश यांना वारंवार पुरावे देऊनही, सावध करूनही त्यांनी लक्ष दिले नाही. पुढे ही माणसे इथेच थांबली नाहीत तर माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर नको त्या गोष्टी पसरवण्यात आल्या. तरीही मी शांत होतो. मी कितीतरी वेळा वीरेशसमोर रडलो, पक्षात फूट पडू नये म्हणून प्रयत्न केले, असे स्पष्टीकरण आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी माध्यमांसमोर दिले.
पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर अखेर मनोज परब यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरचिटणीस विश्वेश नाईक, खजिनदार अजय खोलकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षांतर्गत सुरू असलेली लॉबिंग, धर्म आधारित फूट पाडण्याचे प्रयत्न, सोशल मीडियावरील हल्ले आणि आमदार वीरेश बोरकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अजय खोलकर म्हणाले की, पक्ष विसर्जित करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. काही सदस्यांकडून जाणीवपूर्वक खोटे कथानक रचले जात आहे. आगामी निवडणुका आरजी पूर्ण ताकदीने लढवणार आहे. रविवारी झालेल्या सीईसी बैठकीतही आमदार वीरेश बोरकर उपस्थित राहिले नाहीत. सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वीरेश बोरकर यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्ष अजूनही चर्चा आणि तोडगा काढण्यास तयार असून आमदारांनीही पुढाकर घ्यावा, असे आवाहन मनोज परब यांनी केले.