

ठळक मुद्दे:
ग्रामस्थ, महिलांकडून संताप व्यक्त
खालचावाडा, गिरकरवाडातील ग्रामस्थांचे हाल
खात्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप
रात्री २ वा. सुमारास होतो पाणीपुरवठा
हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील खालचावाडा, गिरकरवाडा भागात गेल्या तीन दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने धांदल उडाली असून काहींवर तर टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा खात्याचे या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खालचावाडा, गिरकरवाडा भागात गेले तीन दिवस पाणी टंचाई होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून खात्याने पाणी पुरवठा टँकरने न करण्यामागे हयगय केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. गिरकरवाडा व अन्य भागांत बुधवारी रात्री २ च्या सुमारास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. त्यामुळे मध्यरात्रीच अनेकांची झोपमोड झाली. अनेकांनी रात्रभर जागरण करून पाणी घ्यावे, अशी अपेक्षा खात्याचे कर्मचारी बाळगतात का, असा प्रश्न एका स्थानिक महिलेने केला. या भागात पाण्याचा पुरेसा दाब नसल्याने पाणीपुरवठा टाकीमध्ये होत नाही. त्यामुळे पंपद्वारे पहिल्या मजल्यावर चढवावे लागते. पूर्वी पाण्याचा दाब ठीक होता, मात्र अलीकडे ही समस्या वाढल्याने संताप व्यक्त होत आहे, अशी कैफियत ग्रामस्थ टोनी फर्नांडिस यांनी व्यक्त केली.
या भागात उंचावरील घरांना अद्यापही पाणीपुरवठा होत नाही. त्याबाबतीत खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तोडगा काढावा, अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी केली. पाण्यासाठी विहिरी कोरड्या व वापरा पलीकडच्या असल्याने नळाद्वारे पुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र, मध्यरात्री पाण्यासाठी जागते राहण्याची वेळ आमच्यावर आणण्यात आली, अशी खंत या भागातील एका मासोळी विक्रेत्या महिलेने व्यक्त केली. संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी किमान पाण्याची वेळ संबंधित पंच किंवा एखाद्या नागरिकास द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
या भागात दर दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात होता, ते ग्रामस्थांसाठी सोयीचे होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी वेळ बदलल्याने ग्राहकांची बरीच धांदल उडत आहे. परिणामी, काहींनी टँकरचे विकत पाणी घेतले, असे अनंत नाईक यांनी सांगितले. खात्याने जनतेची दिशाभूल न करता, गैरसोय होणार नाही, असे काहींनी मत व्यक्त केले.
मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी ३० एमएलडी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मांद्रे व मोरजी गावाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे दिलेल्या आश्वासनाचे स्वागत आहे. त्यांनी पुढील टप्प्यात हरमल गावचाही समावेश करावा व जनतेला आश्वासत करावे, असे मत टोनी फर्नांडिस यांनी व्यक्त केले.