

पणजी : पुढारी वृत्तसेवा
यावर्षीच्या पावसाळ्यात संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्यभरात ३६ भूस्खलनप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यात उत्तर गोव्यातील १५ व दक्षिण गोव्यातील २१ ठिकाणांचा समावेश आहे. मामलेदारांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी ही यादी तयार केली आहे.
या ४० ठिकाणांची माहिती देतानाच आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत. राज्यात मान्सून अद्याप दाखल झाला नसला, तरी हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे माती व दगड रस्त्यावर कोसळणे तसेच भूस्खलनामुळे घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडतात.
त्यामुळे जीवित आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय राबवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत धोकादायक क्षेत्रांची पाहणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सर्वाधिक धोका
मुरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यास डोंगरावरील माती व दगड रस्त्यावर वाहून येऊन वाहतुकीसाठी धोका निर्माण होतो. काही भागांत पावसाचे पाणी आणि माती थेट घरांमध्ये शिरते. यापूर्वी मुरगाव आणि सासष्टी तालुक्यांत अशा घटना घडल्याने यंदाच्या यादीत मुरगाव तालुक्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.