

अरुण जयराम कामत, म्हापसा
गोमंतक हा एकूणच उत्सवप्रिय प्रदेश. कार्तिकी एकादशीनंतर येथील गावांगावांतील जत्रा- काल्यांचाचा मौसम चालू होतो. मार्गशीर्षात तर जत्रोत्सवांचा बहर असतो. माघ महिन्यात कवळे- मंगेशीची जत्रा भरते. चैत्र महिना उजाडतो आणि समस्त भाविक गोवेकरांना वेध लागतात ते श्री लईराई मातेच्या जत्रोत्सवाचे.
आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ‘फुलकारां’च्या दारातीली मोगऱ्यांचा दरवळ मांडवावर फुलणाऱ्या बहराची वर्दी देतो. रणरणत्या वैशाखातील शुद्ध प्रतिपदेपासून धोंडगणांचे कडक उपवासाचे एक व्रत सुरू होते आणि अस्नोडा- शिरगाव भागात जत्रा त्याच दिवसापासून भरू लागते. वैशाख शुद्ध पंचमी हा जत्रेचा दिवस. शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो भाविकांच्या उपस्थितीत जत्रेला सुरुवात होते. मध्यरात्री देवीचे ‘चौगुले’ (मानकरी) होमखंड पेटवतात. हां हां म्हणता ते अग्निकुंड धगधगू लागते. उत्तररात्री व्रतस्थ धोंड त्या तप्त निखाऱ्यांवरून शिस्तबद्धरित्या अग्निदिव्य पार पाडतात. या होमखंडाच्या बाजूलाच एक पुरातन वडाचे झाड होते. धगधगते प्रचंड अग्निकुंड त्या वडाच्या जवळ असूनही वटवृक्षाच्या एकाही पानाला त्याची धग, वा झळ बसून ते कोमेजत नसे.
त्यामागे काही शास्त्र आहे का, की नाही, याची कल्पना नाही; पण माझ्या मते हा दैवी चमत्कार आहे. काही वर्षांपूर्वी हा वटवृक्ष कोसळला. ग्रामस्थांनी आता होमकुंडा जवळ नवीन वडाचे रोप लावले आहे. ते ही जोमाने वाढत आहे. वैशाख वणवा झेलीत होमकुंडाचे अग्निदिव्य पार पाडण्यास स्वतःला तयार करीत आहे.