

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यातील पालये येथे एका बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिले आहेत. शनिवारी रात्री पेडणे पालये गावातील बागतवाडा परिसरात काही स्थानिक नागरिकांना हे बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी याविषयी तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सूचित केले.
माहिती मिळताच पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. वनविभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बिबट्याच्या या पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे मूळ कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच यावर अधिकृत भाष्य करणे शक्य होईल.
राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांना या संपूर्ण घटनेची सखोल आणि विस्तृत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या परिसरात बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की यामागे काही मानवी हस्तक्षेप अथवा शिकारीचा प्रयत्न होता, या दृष्टीने तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात आढळला होता
वाघाचा मृतदेह २ मे रोजी दक्षिण गोव्यात भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याजवळ एका वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. त्या घटनेनंतर आता पालयेत बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा आणि जंगलातील मानवी हस्तक्षेपाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.