

पणजी : पुढारी वृत्तसेवा
स्वयंपूर्ण गोव्याचे सरकारचे स्वप्न हळूहळू पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. गोवा राज्य फलोत्पादन विकास महामंडळाच्या माहितीनुसार, गेल्या साडेचार वर्षांत गोव्यातून तब्बल १६.२० लाख किलो भाजी बेळगावला पाठवण्यात आली आहे.
गोवा राज्य फलोत्पादन विकास महामंडळ स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली भाजी प्रथम स्वतःच्या आउटलेट्स आणि स्थानिक खासगी विक्रेत्यांना वितरीत करते. राज्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर उरलेली भाजी विक्रीसाठी बेळगाव मार्केट यार्डात पाठवली जाते.
सध्याची मागणी आणि बाजारातील गरज लक्षात घेऊन संबंधित पुरवठादार ही भाजी बेळगावला पाठवतात. त्यानंतर पुरवठादार बेळगाव बाजारात किंवा मोठ्या खासगी विक्रेत्यांना भाजी विकतो, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. या भाजीला २८.८५ लाख रुपयांचा दर मिळाला असून, त्यात सर्वाधिक ४२ टक्के पुरवठा एकट्या काकडीचा आहे.
गेल्या साडेचार वर्षांत गोव्यातून बेळगावला अनेक प्रकारच्या भाज्या पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये गावठी काकडी ६.९६ लाख किलो, भेंडी ३.७२ लाख किलो, चिटकी ३.४४ लाख किलो, पडवळ १.६५ लाख किलो, वांगी १९,५२४ किलो, हिरवी मिरची १२,६८३ किलो आणि कारली ७,२६९ किलो यांचा समावेश आहे. सर्वाधिक ४२ टक्के निर्यात एकट्या काकडीची झाली आहे.
सन २०२२-२३ ते २०२६-२७ (ऑगस्टपर्यंत) या कालावधीत भाजीच्या निर्यातीत बरीच वाढ झाली आहे. मात्र, २०२४-२५ मध्ये भाजीच्या पुरवठ्यात १.४२ लाख किलोची घट नोंदवली गेली. त्याच वर्षी भाजीच्या दरात २ लाख रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.