पणजी : पुढारी वृत्तसेवा
पुढील पिढीचा विचार करून सुविधा उभारणे, उपक्रम आयोजित करणे आदी गोष्टी व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना त्यांना संशोधणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मराठा शिक्षण संस्कृती मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त बुधवारी पर्वरी येथे मराठा भवन या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये,
मंडळाचे अध्यक्ष रवळू शेट्ये आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी, मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले आणि गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वाढीसाठी व यशासाठी मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सन्मानही केला.
स्पर्धा परीक्षेद्वारे देशसेवा करा : मुख्यमंत्री
राज्यातील युवा वर्गाने आयपीएस, आएएस व आयएफएस सारख्या परीक्षा देऊन या क्षेत्रातून देशसेवा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. तसेच व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि हितचिंतकांचे ५० गौरवशाली वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आणि भावी पिढ्या घडवण्यासाठी संस्थेला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.