

पुणे : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमच्या राजकीय विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी वैयक्तिक पातळीवर आपण सर्वजण एकमेकांचे हितचिंतकच असतो. तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींचे अंतिम ध्येय हे लोकांची सेवा करणे हेच असते. राजकारणाच्या पलीकडे पाहिल्यास गोव्याचे नेतृत्व एका सक्षम आणि जबाबदार व्यक्तीच्या हातात असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य (सनी) मानकर यांनी केले.
शनिवारी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ४४ व्या दीक्षांत समारंभात डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांच्या ' स्वयंपूर्ण गोवा ' या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी मानद डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत विद्यापीठाने हा सन्मान जाहीर केला.
दीक्षांत समारंभानंतर पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांना शिंदेशाही पगडी, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्यात मानकर करत असलेल्या उपक्रमांचे कौतुकही केले. ' स्वयंपूर्ण गोवा ' या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात आत्मनिर्भरतेला चालना देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अध्यक्ष मानकर यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी अतुल म्हस्के, महेश धुमाळ, अमोल वाखरे, टिळक बोहरा, गोविंद केंद्रे, रोहित चव्हाण, रवींद्र साळुंखे, आदित्य वाखरे, अभिषेक वाखरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्वयंपूर्ण गोवा ' उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, उद्योजकतेला चालना आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या बाबींना चालना मिळत असल्याचेही या चर्चेत नमूद करण्यात आले.