

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नैऋत्य मान्सूनचा हंगाम संपत आला असून, गोव्यात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक हंगामी तूट असलेल्या राज्यांमध्ये गोवा सहाव्या क्रमांकावर आहे. राज्यात आतापर्यंत १,८७३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी २,८३५ मिमीच्या सामान्य हंगामी आकड्यापेक्षा बरीच कमी आहे.
पणजीसुमारे ९६१ मिमीच्या या फरकामुळे गोव्यातील एकूण पावसाची तूट ३४ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या मेघालय ५९ टक्के पावसाच्या तुटीसह सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या राज्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश ४४ टक्क्यांसह आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि पंजाबमध्ये अनुक्रमे ४२, ४१ आणि ४० टक्क्यांची तूट नोंदवली गेली आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाच्या कामगिरीला आणखी फटका बसला आहे. आज, मंगळवारी सकाळी नोंदवलेल्या नोंदींप्रमाणे गेल्या २४ तासांत कुठेही पाऊस पडल्याची नोंद नाही. १ ते १४ सप्टेंबर दरम्यान राज्यात केवळ ८१.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमान १४५.७ मिमी आहे, परिणामी मासिक पावसात ४४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे.
पावसाच्या दडीमुळे वारंवार कोरडे दिवसही पडत आहेत. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सात कोरडे दिवस नोंदवले गेले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या निकषांनुसार, ज्या दिवशी २.५ मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो, तो दिवस कोरडा मानला जातो. शेजारील राज्यांमध्येही पावसाची कमतरता जाणवत आहे.
कर्नाटकात सप्टेंबरमध्ये पावसात आतापर्यंत अंदाजे ८१ टक्क्यांची तूट नोंदवली गेली आहे, तर महाराष्ट्रात सुमारे ६६ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात कोणताही हवामान इशारा जारी केलेला नाही, यावरून असे सूचित होते की या कालावधीत मोठ्या पावसाचा कोणताही अंदाज नाही.