

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात अमली पदार्थ नियंत्रणाबाबत परिषद घेत असताना, भाजप सरकारचा अमली पदार्थाविरोधातील कारभार नेमका किती प्रभावी आहे, याचे उत्तरही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोमंतकीयांना द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
चोडणकर म्हणाले की, गोव्यात अमली पदार्थांचा प्रसार आणि त्यांची सहज उपलब्धता याबाबत गोमंतकीय सातत्याने गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात येऊन नार्कोटिक्स नियंत्रणावर भाषण करणे, ही अत्यंत विडंबनात्मक बाब आहे. देशाला अमली पदार्थ नियंत्रणाचे धडे देण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी गोव्यातील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
गोव्यात कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करून त्यामागील प्रमुख सूत्रधारांवर कारवाई करण्यात भाजप अपयशी का ठरले, असा प्रश्नही चोडणकर यांनी केला. मोठ्या माशांना सोडून कधीही गोवा ड्रग्जमुक्त करता येणार नाही, असे सांगत कोलवाळ कारागृहाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले.