

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जुने गोवे ते साखळी हे अंतर कमी करणाऱ्या गवंडाळी धावजी येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असून या उड्डाणपुलाचे खांबे पूर्ण झाले आहेत. कामाला विलंब होण्यास कारण म्हणजे वाहतूक सुरू ठेऊन काम केले जात आहे.
तसे पाहता हे उड्डाणपूल डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण करायचे होते. मात्र, अद्याप तरी ते अर्धे झालेले आहे. सध्या या पुलाचे पाचही खांब पूर्ण झाले असून वाहतूक सुरू ठेवून काम सुरू असल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करावे लागत आहे.
गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे सुमारे ८० कोटी खर्च करून हे उड्डाणपूल बांधले जात आहे. पणजी ते फोंडा ह्या रस्त्यावर खोर्ली येथे रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गवंडळी मार्गेचा रस्ता सत्तरी तालुका व डिचोली तालुक्यातील वाहन चालकांना उपयुक्त ठरतो. मात्र, दिवसातून पन्नास वेळा विविध रेल्वे या मार्गावरून येत असल्यामुळे पन्नास वेळा फाटक बंद करावे लागते. प्रत्येकवेळी सात ते आठ मिनिटे ते बंद राहते. वाहनचालकांना तिष्ठत राहावे लागते.
त्यामुळे येथे उड्डाण पुलाची मागणी वारंवार होत होती. शेवटी या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले. मात्र, वाहतूक बंद ठेऊन उड्डाणपुलाचे काम करण्याचे प्रयत्न विफल होत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाला आणखी विलंब होण्याची शक्यता दिसते.