

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पणजीत फुलांचा बाजार बहरलेला दिसला. फुलांच्या आणि हारांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. एरवी फुलांचा १०० रुपये पाव किलो असलेला दर १५० रुपये झाला होता. साधे सूर्यफूलही १०० रुपयांना एक मिळत होते. झेंडूचे हार ८० रुपये मीटरने विकले जात होते. खरेदीदारांचा गणेशोत्सवामधील उत्साह पाहून फुले आणि हारांचे दर वाढवण्यात आले होते.
राज्याबाहेरून आलेले अनेक विक्रेते रस्त्यालगत झेंडूचे हार विकत होते. त्यांनीही फुलांचा दर जास्त ठेवला होता, उद्या उरलेली फुले हेच विक्रेते रस्त्यालगत फेकून देणार आहेत. मात्र, ग्राहकांना दर कमी करून ते विकत नाहीत, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
ग्राहकांनी फुले, हार खरेदीसाठी गर्दी केली होती.
अगदी ४० रुपयांपासून ८०० पर्यंत हार उपलब्ध होते. त्यात ऑर्किड, गुलाब, शेवंती, मोगरा व फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारातील हार बनवण्यात आले होते. विक्रेत्यांकडून एकाच प्रकारच्या हारांची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी सांगण्यात येत होती.
फूल बाजारातील विक्रेत्यांनी येण्या-जाण्याच्या वाटेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे फुले खरेदी करण्यासाठी आत जाणाऱ्या ग्राहकांना सहजपणे ये-जा करता येत नाही. महिलांचे तर खूपच हाल होतात, याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने अशी स्थिती झाल्याचे सांगण्यात आले. महापौर आणि आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे.