

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भाजपमध्ये काही मतदारसंघांतील उमेदवारीवरून अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. कुडचडेचे विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाने तिकीट दिले तरी ते घ्यावे की नाही याबाबत मला दोनदा विचार करावा लागेल, असे विधान केले होते. त्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, कदाचित काब्राल यांना राजकीय असुरक्षितता जाणवत असावी.
काब्राल यांच्या पूर्वीच्या राजकीय पार्श्वभूमीचा संदर्भ देताना दामू म्हणाले, २०११ पूर्वी ते काँग्रेसशी संबंधित होते. त्यावेळी त्यांना पक्षाचे तिकीट देण्यात आले होते. तेव्हा इतर काही जणांवर अन्याय झाला असण्याची शक्यता आहे. पण पक्षाने एकदा काब्राल यांना उमेदवारी दिल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले.
काब्राल यांच्यासारखे अनेक नेते कुडचडेत असल्याचे दामू नाईक म्हणाले. काब्राल भाजपचे आमदार आहेत पण उमेदवारीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी एक प्रक्रिया आहे, भाजपामध्ये ती पार पाडली जाते असे दामू नाईक म्हणाले.
काब्राल हे कुडचडेचे विद्यमान भाजप आमदार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुडचडे मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. त्यामुळे कुडचडेमधून भाजपचा उमेदवार कोण असेल आणि विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांना पुन्हा संधी मिळेल का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.