

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या मातीच्या घरात जीव मुठीत धरून दिवस काढणाऱ्या प्रकाश नाईक यांच्या कुटुंबाला अखेर दिलासा मिळाला आहे. कुडचडेतील युवकांनी एकजुटीने पुढाकार घेत या गरजू कुटुंबासाठी निवारा उभारण्याचा संकल्प केला असून, नव्या घराच्या उभारणीस सुरुवात झाली आहे.
या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि ग्रामएकतेचे प्रेरणादायी चित्र समोर आले आहे. प्रकाश नाईक यांचे पाच जणांचे कुटुंब सुमारे चाळीस वर्षांपूर्वी उभारलेल्या, दोन खोल्यांच्या मातीच्या घरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत होते. घराच्या भिंती कोणत्याही क्षणी कोसळतील, अशी भीती कायम डोक्यावर होती.
पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होत होती. प्रकाश नाईक हे पायलट असून, प्रवाशांकडून मिळणाऱ्या अल्प भाड्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. मर्यादित उत्पन्नामुळे घराच्या दुरुस्तीचे किंवा नव्या घराचे स्वप्न त्यांच्यासाठी केवळ स्वप्नच राहिले होते.