पणजी : नशामुक्त गोव्यासाठी विविध स्तरावरून सरकारी यंत्रणा तसेच एनजीओ प्रयत्नशील आहे. विकसित गोवा २०३७ पूर्वी गोवा नशामुक्त केला जाईल. विकसित गोव्याचे विकसित नागरिक बनण्यासाठी ड्रग्जपासून दूर राहावे. ड्रग्जचा नायनाट करण्यासाठी सरकारबरोबर ताकद लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, खात्याच्या संचालक सुधांश पंत, समाजकल्याण खात्याचे सचिव सप्रतसिंग गिल, केंद्रीय खात्याच्या उपसंचालक प्रतिमा गुप्ता तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेकइन इंडिया यासारखे उपक्रम देशभर सुरू करून ते यशस्वी केले. नशामुक्त भारत हा त्याचाच एक भाग असल्याने ड्रग्जला बळी पडू नका. पीईएस कॉलेजने नशामुक्ती यासंदर्भात केलेल्या पथनाट्यातून एक चांगला संदेश दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
ड्रग्जविरोधात राज्यात अमलीपदार्थविरोधी कक्ष, एनजीओ, समाजकल्याण व पुनर्वसन केंद्रे चांगली कामगिरी करत आहेत. ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशक त्यांना ड्रग्जचे परिणाम याची माहिती देऊन ड्रग्ज व्यसनातून बाहेर काढण्यात काही प्रकरणात यशस्वी ठरले आहेत. मानसिक संतुलन बिघडल्यावर किंवा एकदा घेऊन बघूया असे म्हणत त्याचे सेवन करणारे त्याच्या आहारी जातात. त्यामुळे ड्रग्जला हात लावणार नाही, घेणार नाही तसेच कोणी घेत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याची शपथ सर्वांनी घ्यायला हवी. ज्यांचे पाल्य ड्रग्जच्या आहारी गेले आहेत त्या पालकांनी त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करावे व एक चांगला नागरिक बनवण्यास मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
ड्रग्जचे गोव्यातून उच्चाटन करण्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यामुळेच तर पोलिसांना ड्रग्ज माफिया व विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. समुद्रकिनारे व पर्यटन क्षेत्रात ड्रग्ज तस्करीवर कडी नजर ठेवली जात आहे. ड्रग्जबाबत पोलिस यंत्रणा शालेय तसेच गावागावात जनजागृती करत आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करून अनेकांना गजाआड करण्यात यश आले आहे. ड्रग्ज माफियांचे जाळे मोडून काढण्यास पोलिस सक्रिय झाले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी नशामुक्त झालेल्यांचे व काही ब्रह्माकुमारी दिदींचा नशामुक्तीसाठी करत असलेल्या कार्यासाठी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
गोव्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे ड्रग्ज वेगवेगळ्या मार्गाने बाहेरील देशातून येतात. त्याच्या आहारी गेलेल्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी ब्रह्माकुमारी दिदी तसेच समुपदेशक चांगले काम करत आहेत. गेल्या ७ - ८ वर्षात गोव्यात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.