

पणजी : जंतर मंतरवर नीट आंदोलनावेळी काही युवकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या आई, सैनिक, पोलिस आदींना शिव्याशाप दिला होता. त्यावर देशभर तीव्र नापसंती व्यक्त होत असताना शनिवारी व्हिडीओ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युवकांना संदेश दिला. त्यांना माफ केल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही शनिवारी एक व्हिडीओ काढून युवकांनी, चांगली संगत धरावी व करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा संदेश दिला. त्यासोबतच जंतर मंतर आंदोलनानंतर गोव्यात घडलेल्या घटनावर भाष्य केले.
डॉ. सावंत यांनी सांगितले की, गोव्यात बाहेरून आलेल्या लोकांनी गोव्यातील तरुणांना आणि रहिवाशांना त्यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी भडकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गोव्यातील तरुण आणि पालक हुशार होते. ते या अपप्रचाराला बळी पडले नाहीत. भविष्यात गोव्यातील लोकांनी अशा सापळ्यात अडकू नये, असे आवाहन केले.
मूल्यांचेही पालन गरजेचे
लोकांनी आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे. पण त्याचबरोबर आपण आदरपूर्वक संवाद, जबाबदार नागरिकत्व आणि लोकशाहीतील विधायक सहभाग या मूल्यांचेही पालन करायला हवे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ संदेशातून सांगितले.